मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०१४

४. श्रीक्षेत्र शिंगणवाडी -
चाफळपासून अर्धा ते एक कि. मी. अंतरावर नैऋत्य दिशेस शिंगणवाडी ही टेकडी आहे. या टेकडीवरील गुहेत समर्थ रामदास स्वामी जप, ध्यान-धारणा करीत असत. म्हणून आपल्या दैवताची-मारुतीची मूर्ती त्यांनी तेथे शके १५७१ मध्ये स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामींची ऐतिहासिक भेट ही इथल्या मठालगत असलेल्या वृक्षाखाली झाली असे काही अभ्यासकांचे मत आहे.

शिंगणवाडीच्या मारुतीस ‘खडीचा मारुती’ किंवा ‘बालमारुती’ असेही म्हणतात. सुमारे ६ फूट लांब-रुंद असणार्‍या गाभार्‍यात साडेतीन फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वजा आहे. तर उजवा हात उगारलेला आहे. मंदिराच्या आजुबाजुचा परिसर हा आल्हाददायक व पवित्र वातावरणाचा आहे.

मंदिर उंचावर असून मंदिराला तांबडा रंग दिलेला आहे. मंदिर हे चाफळच्या परिसरातून कुठूनही दिसते. चाफळपासून हा मारुती थोड्या अंतरावर असल्यामुळे याला चाफळचा तिसरा मारुती असेही म्हणतात.

चाफळच्या श्रीराम देवस्थानकडून या मंदिराची पूजा केली जाते. चाफळच्या दोन मारुतींचे व श्रीरामाचे दर्शन घेतल्यावर या शिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घेतल्याशिवाय भाविक परत जात नाहीत. ‘रामघळ’ हे समर्थांच्या साधनेचे ठिकाण येथून जवळच आहे.
५. श्रीक्षेत्र उंब्रज -
मसूरच्या पश्चिमेस चार किलोमीटर अंतरावर उंब्रज हे ठिकाण आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी वयाने लहान वाटणार्‍या या मारुतीस ‘बालमारुती’ म्हणतात. या मूर्तीची उंची सुमारे ६ फुट असून मूर्ती आकर्षक आहे. मूर्ती चुना, वाळू व ताग या तिन्हीच्या मिश्रणातून बनवलेली आहे. मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. या मारुतीला ‘उंब्रजचा मारुती’ किंवा ‘मठातील मारुती’ असेही म्हणतात. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराला कळस नाही.उंब्रजच्या मारुतीची स्थापना शके १५७१ मध्ये केली गेली.

‘विश्रामधाम’ या ग्रंथातील उल्लेखानुसार या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थ रामदास स्वामींनी येथे सलग १३ दिवस कीर्तन केले. या मूर्तीच्या स्थापनेसंबंधी असेही म्हटले जाते की, चाफळहून समर्थ उंब्रजला स्नान करण्यासाठी येत असत, म्हणून या मारुतीची स्थापना केली असावी. मंदिराच्या जवळूनच कृष्णा नदी वाहते. परिसर अतिशय पवित्र व मंगलमय आहे. चैत्र शुद्ध १५ ला हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. हनुमान जयंतीच्या १ दिवस आधी इथे ‘सांप्रदायिक भिक्षेचा’ कार्यक्रम होतो.
६. श्रीक्षेत्र माजगाव
चाफळहून माजगांव हे सुमारे २ कि. मी. अंतरावर आहे. माजगावच्या मारुतीची उंची ५ फूट असून मूर्ती पश्चिममुखी आहे. चाफळच्या रामाकडे या मूर्तीचे तोंड आहे.

या मूर्तीच्या स्थापनेसंदर्भात असे म्हटले जाते की, या गावाच्या वेशीवरील एका दगडाला लोक मारुती समजत. समर्थांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अशी इच्छा गावातील लोकांची होती. त्याप्रमाणे समर्थांनी स्वत: त्या दगडावर सुंदर मूर्तीकाम करून मारुतीची मूर्ती घडवली. शके १५७१ मध्ये या मारुतीची स्थापना करून तेथे एक देऊळही बांधले.

मूळ मंदिर आठ फूट लांबी-रुंदीचे असून ते कौलारू आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानकडे या मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम आहे. सध्याचे मंदिर हे श्रीधर स्वामींनी बांधले आहे असे म्हटले जाते.

यात्रेकरूंसाठी या मंदिराच्या जवळपास म्हणावी अशी खास सोय नाही. परंतु मंदिराच्या समोर असलेल्या सभामंडपात निवासाची सोय होऊ शकते.
७. श्रीक्षेत्र बहे - बोरगाव
कृष्णा नदीच्या किनारी बोरगावजवळ बहे हे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणाला बहे - बोरगाव म्हणतात. बहे-बोरगांवचा मारुती हे एक जागृत देवस्थान आहे. इथली मूर्ती ही भव्य असून मूर्तीच्या डोक्यावर उंच मुकुट आहे. कृष्णा नदीच्या प्रवाहात ‘रामलिंग’ नावाचे एक प्राचीन बेट आहे. या बेटावर राममंदिर आहे. या राममंदिराच्या पाठीमागेच मारुतीची स्थापना शके १५७३ मध्ये समर्थांनी केलेली आहे. मंदिर अतिशय प्रसन्न व निसर्गरम्य ठिकाणी आहे.

रावणवध करून परत येत असताना राम-लक्ष्मण यांनी बहे या गावी मुक्काम केला असे म्हटले जाते. भक्तिरसाने भरलेले भीमरूपी स्तोत्र समर्थांना याच मारुतीचे ध्यान करीत असताना सुचले असेही म्हटले जाते. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी निसर्गसृष्टीने बहरलेला व अगदी रम्य असा इथला परिसर आहे. मारुती मंदिराबरोबरच या कृष्णा नदीत अनेक लहान-लहान बेटे व अनेक समाधी इथे आहेत. कृष्ण-माहात्म्यात ‘बाहुक्षेत्र’ असा या स्थानाचा उल्लेख आढळतो. या बेटापासून ‘मच्छिंद्र’ गड जवळच आहे.
८. श्रीक्षेत्र मनपाडळे
समर्थस्थापित अकरा मारुतीपैकी मनपाडळे हा एक. नदीच्या काठी वसलेले हे मारुती मंदिर कौलारू आहे. मंदिराचा गाभारा ७ x ६ चौ. फूट असून याच्याभोवती २६ x १५ चौ. फुटांचा भव्य सभामंडप आहे. मूर्ती प्रसन्न असून नवसाला पावणारी आहे असे मानतात. मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूर्ती सुमारे ५ फूट उंचीची असून मूर्तीजवळ कुबडी आहे.

ज्योतिबाचा डोंगर व पन्हाळगड ही ठिकाणे येथून अगदी जवळच्याच अंतरावर आहेत. अशा या पवित्र व रम्य परिसरात ह्या मूर्तीची स्थापना समर्थांनी शके १५७३ साली केली.
९. श्रीक्षेत्र पारगाव -
मनपाडळे या तीर्थक्षेत्रापासून सुमारे ५ कि. मी. अंतरावर पारगाव हे गाव आहे. या गावात समर्थांनी शके १५७४ मध्ये मारुतीची स्थापना केली. अकरा मारुतींपैकी हा ‘पारगावचा’ मारुती म्हणून ओळखला जातो. मूर्ती सपाट दगडावर कोरलेली आहे. मूर्ती डावीकडे तोंड करून धावत चालली असून, मारुतीने केसाची शेंडी बांधलेली आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी ही मूर्ती सर्वात लहान असून फक्त दीड फूट उंचीची आहे.

या मंदिराचा मूळ घुमट हा ८ फूट लांबीरुंदीचा आहे. मंदिराला नव्यानेच सभामंडप बांधण्यात आला आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा शेवटचा मारुती असे समजले जाते.

पन्हाळ्यापासून काही अंतरावरच पारगाव हे ठिकाण आहे. या ठिकाणाबद्दल असे म्हटले जाते की, छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी हे स्वराज्याविषयी  चर्चेसाठी या गावी येत असत. पन्हाळा व ज्योतिबा ही ठिकाणे या गावापासून अगदी जवळच आहेत.
१०. क्षेत्र शिराळे
समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा एक महत्त्वपूर्ण मारुती होय. भक्ताच्या हाकेला धावून जाणारा व सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून हा मारुती ओळखला जातो. येथील मंदिर व मूर्ती ही उत्तरभिमुख आहे. या मारुतीला ‘वीरमारुती’ म्हणतात. मूर्तीची उंची सुमारे ७ फूट आहे. मूर्ती ही सुबक व रेखीव कोरलेली आहे. मूर्तीच्या डोक्यावरील झरोक्यांतून सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीवर प्रकाश पडतो. हे दृश्य अतिशय सुंदर दिसते.

मंदिरासमोर प्रशस्त असा सभामंडप आहे. अकरा मारुतींच्या देवळात हे मंदिर सर्वात सुंदर आहे असे भाविक म्हणतात. समर्थांनी मंदिराची स्थापना १५७६ मध्ये केली. मूर्ती स्थापनेनंतर समर्थशिष्य जयरामस्वामी यांनी कौलारू मंदिर बांधले. पुढील काळात एका भक्ताने दगडी मंदिर बांधून मंदिराचा जिर्णोद्धार केला. शिराळे हे गाव गारूड्यांच्या व नागांच्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. मंदिर गावाच्या मध्यभागी असून बसस्थानकापासून जवळच आहे. हनुमान जयंतीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.
समर्थस्थापित मारुती
श्री मारुती ही बलाची, बुद्धीची व विद्येची देवता आहे. रामभक्त व हनुमानभक्त समर्थ रामदास स्वामींना हनुमंताचाच अवतार समजले जात होते. १२ वर्षे तपश्चर्या केल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. त्यामुळे त्याकाळच्या समाजस्थितीचे दर्शन त्यांना झाले. भारत भ्रमण करून झाल्यानंतर त्यांनी असे ठरविले की, आपल्याजवळ असणार्‍या ज्ञानाचा, अनुभवाचा, प्राप्त झालेल्या सिद्धींचा उपयोग जनतेची मने रामभक्तीकडे वळवण्यासाठी करावा, श्रीरामाचा दास मारुती याच्या अंगी असलेल्या बलाची उपासनादेखील लोकांना शिकवावी व यासाठी लोकजागृती करावी. संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करत कित्येक गावात त्यांनी स्वत: श्रीमारुतीची स्थापना केली. परंतु त्यांनी ११ ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे. हे ११ मारुती ही जागृत देवस्थाने मानली जातात. हे सर्व मारुती कृष्णानदीच्या तीरावर आहेत. लोकांना मारुतीच्या उपासनेला लावून समर्थांनी धैर्य आणि बलसंपादनाची ईर्षा लोकांमध्ये जागृत केली.

शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीच्या क्षेत्रातच हे विशेष महत्त्व असलेले अकरा मारुती आहेत, ही विचार करण्यासारखी बाब आहे. समर्थ रामदासांच्या शिष्य वेणास्वामी ह्यांच्या एका अभंगात अकरा मारुतींचा उल्लेख आहे. तो अभंग पुढीलप्रमाणे -

‘चाफळामाजीं दोन, उंब्रेजेसी येक।
परागांवी देख चौथा तो हा।।
पांचवा मसुरीं, शहापुरीं सहावा।
जाण तो सातवा शिराळ्यांत।।
सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा।
दहावा जाणावा माजगावीं।।
बाह्यांत अकरावा येणेरीती गावा।
सर्व मनोरथा पुरवील।।
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास।
कीर्ती गगनांत न समावे।।’


समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुती सूची :
१. शहापूर        -१ स्थापना शके १५६६ (इ. स. १६४४)
२. मसूर          -१ स्थापना शके १५६७ (इ. स. १६४५)
३. चाफळ       -२ स्थापना शके १५७० (इ.स. १६४८)
४. शिंगणवाडी -१ स्थापना शके १५७१ (इ. स. १६४९)
५. उंब्रज          -१ स्थापना शके १५७१ (इ. स. १६४९)
६. माजगाव      -१ स्थशपना शके १५७१ (इ. स. १६४९)
७. बहे बोरगाव  -१ स्थापना शके १५७३ (इ. स. १६५१)
८. मनपाडळे    -१ स्थापना शके १५७३ (इ. स. १६५१)
९. पारगाव       -१ स्थापना शके १५७४ (इ. स. १६५२)
१०. शिराळे      -१ स्थापना शके १५७६ (इ. स. १६५४)
ही सर्व मारुती मंदिरे सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या परिसरात आहेत.

समर्थ स्थापित अकरा मारूती
१. श्रीक्षेत्र शहापूर -
शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणजे समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी पहिला मारुती आहे. अकरा मारुतींच्या स्थापनेच्या कालावधीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत, पण ‘पहिला मारुती शहापूरचाच’ याबाबत सर्वांचे एकमत असल्याचे आढळते. मूर्तीची उंची सुमारे ६ फूट असून मूर्तीचा चेहरा उग्र वाटणारा आहे. मारुतीच्या डोक्याला गोंड्याची टोपी आहे. मंदिर व मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे. देवळाला तीन चौकटी आहेत. शहापूरकर कुलकर्णी यांच्या घराण्याकडे मूर्तीची व्यवस्था आहे. याठिकाणी चैत्र शु. १५ व्या तिथीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. मुख्य मूर्तीबरोबरच मंदिरात एक लहानशी पितळी उत्सवमूर्ती आहे. ही उत्सवमूर्ती चाफळच्या रामनवमीच्या उत्सवात, तेथील मंदिरात दरवर्षी आणलीच जाते.

शहापूरच्या मारुतीची स्थापना शके १५६६ साली केली गेली. कर्‍हाड - मसूर या रत्स्यावर कर्‍हाडपासून सुमारे १० कि. मी. अंतरावर शहापूरला जाण्यासाठी रस्ता आहे. मंदिर गावाच्या एका बाजूला असून कृष्णा नदीच्या तीरावर आहे.
२. श्रीक्षेत्र मसूर -
समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी मसूरचा ‘महारुद्र हनुमान’ हा एक महत्त्वाचा मारुती आहे. मूर्ती चुन्याची आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून मूर्तीची उंची साधारणत: ५ फूट आहे. अकरा मारुतींपैकी ही सर्वात देखणी व प्रसन्न मूर्ती आहे. डोक्यावर मुकुट, गळ्यातील माळा, हार, जानवे, लंगोटाचे काठ, हाताची बोटे इत्यादी सर्व गोष्टी अतिशय बारकाव्यांनी रंगविलेल्या आहेत. मूर्तीच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज तर उजव्या बाजूला समर्थ रामदासांची चित्रे काढलेली आहेत. इथे चैत्र शु. १५ ला हनुमानजयंतीचा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

या मारुतीच्या स्थापनेनंतर इथे दरवर्षी रामनवमीचा उत्सव साजरा केला जात होता. एका वर्षी या उत्सवातच समर्थांना कल्याण नावाचा शिष्य मिळाला. तेच समर्थांचे आवडते शिष्य ‘कल्याणस्वामी’ होत.

सुमारे १३ फूट लांबी-रुंदीचा चौरस असलेल्या सभामंडपात सहा दगडी खांब आहेत. अलीकडच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार सज्जनगडच्या श्रीरामदासस्वामी संस्थान या संस्थेने केला आहे. मंदिराजवळच श्री नारायण महाराजांचा मठ आहे.

श्रीक्षेत्र शहापूर या ठिकाणापासून मसूर फक्त ४-५ कि. मी. अंतरावर आहे. पुणे-मिरज या मार्गावर मसूर रेल्वे स्टेशन आहे.
३. चाफळचे दोन मारुती -
चाफळ आणि सज्जनगड ही समर्थांच्या जीवनातील दोन महत्त्वाची ठिकाणे. श्रीरामाने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे अंगापूरच्या डोहातील श्री रामाची मूर्ती समर्थांनी बाहेर काढली व जवळच असलेल्या चाफळला आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. या मंदिराचे बांधकाम शके १५६९ पूर्ण झाले. समर्थांना ज्या वेळी श्रीरामाने दृष्टांत देऊन अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी माहिती दिली, त्याच वेळेस मारुतीनेही समर्थांना दृष्टांत दिला की, ‘माझी मूर्ती श्रीरामाच्या समोर स्थापन कर.’ त्याप्रमाणे श्रीरामाच्या मंदिरात हात जोडून उभा असलेला दासमारुती आणि मंदिराच्या मागे प्रतापमारुती अशा दोन मूर्तींची स्थापना शके १५७० मध्ये समर्थांनी केली. (चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचे म्हटले जाते.)

अ. दासमारुती -
दोन्ही हात जोडून उभी असलेली नम्र मारुतीची मूर्ती म्हणजे अकरा मारुतींपैकी दासमारुती होय. ६ फूट उंच असलेल्या मारुतीच्या चेहर्‍यावर विनम्र असे भाव आहेत. समोरच उभ्या असलेल्या श्रीरामाच्या चरणांवर मारुतीची दृष्टी आहे. मूर्ती अत्यंत रेखीव आहे.

मंदिर अतिशय सुंदर असून आजुबाजुच्या परिसरात प्रसन्न वातावरण आहे. सुमारे ३६० वर्षांपूर्वी समर्थांनी बांधलेले दासमारुतीचे मंदिर आजतागायत चांगल्या स्थितीत आहे. मंदिर एवढे भक्कम आहे की, १९६७ साली झालेल्या भूकंपातही या मंदिरास एक तडाही गेला नाही.
ब. प्रतापमारुती -
अकरा मारुतींपैकी हा महत्त्वाचा मारुती आणि चाफळमधील हा दुसरा मारुती होय. भीममारुती, प्रतापमारुती किंवा वीर मारुती अशी तीन नावांनी हा मारुती ओळखला जातो. मूर्ती जवळजवळ आठ फूट उंच आहे. मारुती स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे ही मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट असून कानात कुंडले आहेत. कंबरेभोवती सुवर्णाची कासोटी असून तिला छोट्या घंटा जोडलेल्या आहेत. (सुवर्ण कटि कासोटी, घंटा किणकिणी...) मूर्ती अतिशय तेजस्वी आहे. भक्तांच्या श्रद्धापूर्वक प्रार्थनेला पावणारा व दुष्टांचा संहार करणारा हा भीमरूपी मारुती एक जागृत देवस्थान आहे.

समर्थ रामदास जेव्हा या मठात राहत असत,  तेव्हा या मंदिरातील मूर्तीपाशी बराच वेळ बसून राहत असे म्हटले जाते. चाफळ गावावरील कोणतेही संकट या मूर्तीच्या पूजेने दूर होते, अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात ह्या मारुतीला महारुद्राभिषेक करण्यात येतो.

चाफळमधील या दोन्हीही प्रसिद्ध मारुतींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी बसेसची सोय आहे. भाविकांना मंदिराच्या परिसरात उत्तम प्रकारची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे.
देवीची साडेतीन शक्तिपीठे

१. सप्तशृंगगड (वणी) -
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्‍या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे.  या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.

श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगीतले जाते. या स्थानाचा `नवनाथ कालावधी' स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते. या पवित्र मंदिराच्या आजुबाजुस दाट जंगल आहे.

सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा इ. महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत.

सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात. या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामीनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते. अशीही एक घटना या स्थानास जोडलेली आहे.

नाशिकपासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्र्चिम रांगेत ही देवी वसलेली आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात.

देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे.

२. माहूर - (देवी रेणुकामाता)-
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.

देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरच्या गडावर रेणुकादेवीबरोबरच परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनसूया मंदिर, कालिका माता मंदिर इत्यादी धार्मिक स्थळेही आहेत. या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

माहूरच्या गडापासून जवळच ‘रामगड’ हा किल्ला असून, काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत. हे स्थान नाशिक जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे.


३. श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी)-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.

स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते.

संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात - श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.

येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे.  मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीनवेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे.

या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.

हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. उस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.

घारशीळ, भारती बुवांचा मठ, पापनाश तीर्थ, धाकटे तुळजापूर, तीर्थकुंड, रामवरदायिनी मंदिर इत्यादी पवित्र धार्मिक स्थळे तुळजापुरात आहेत.

४. कोल्हापूर (श्रीमहालक्ष्मी )-
साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी प्रसिद्ध आहे. महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखांत लिहून ठेवले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो.

बर्‍याच विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे, त्याचे बांधकाम चालुक्याच्या उत्तर काळात झाले. देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्‍या काळ्या दगडात केलेली आहे. देवळाचे शिखर व घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. देवालय आकाराने एखाद्या फुलीप्रमाणे आहे. हेमाडपंती वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी दरजा न भरता, एकमेकावर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी दगडात केलेली आहे. देऊळ पश्र्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे.

श्री महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले, त्याला १ लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. गरूड मंडप / सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला. अश्र्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात. देवळाच्या निरनिराळ्या ठिकाणी अनेक शिलालेख सापडले आहेत.

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी मंदिरात २० पुजारी आहेत. दर शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.

साडेतीन शक्तिपीठांची दंतकथा
पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर (देह) हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक‘ सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच ५१ शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली.

यांपैकी महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती (भवानी माता), माहुरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी ही ती पीठे होत.
ज्योतिर्लिंगे
अनेक धर्म व अनेक देवदेवता असणार्‍या भारत देशात अनेक देवदेवतांची तीर्थक्षेत्रे व तेथील यात्रा प्रसिद्ध आहेत. महादेवांच्या भारतातील प्रमुख १२ मंदिरांना १२ ज्योतिर्लिंगे म्हणतात. या १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात ५ ज्योतिर्लिंगे आहेत. त्यांची माहिती पुढे दिली आहे.

१. त्र्यंबकेश्वर -
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून मंदिर उत्कृष्ट शिल्प व स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे.

या मंदिराचे बांधकाम इ. स. १७५५ साली पेशवे बाळाजी बाजीरावांनी केल्याचा उल्लेख आढळतो. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. त्याचबरोबर निवृत्तीनाथांची यात्रा, त्र्यंबकेश्वराची रथयात्रा इ. महत्त्वाच्या यात्रा या ठिकाणी भरतात. त्रिपिंडी नारायण नागबळीचा विधी भारतात फक्त याच ठिकाणी होतो. जवळच ब्रम्हगिरी पर्वत असून या पर्वतावरून महाराष्ट्रातील सर्वार्थाने महत्त्वाची नदी गोदावरीचा उगम होतो. कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार व मुक्ताई मंदिर, संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांचे समाधी मंदिर इत्यादी महत्त्वाची स्थाने त्र्यंबकेश्वरपासून जवळच्या अंतरावर आहेत.

या ठिकाणी भाविकांसाठी निवासाची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. इथला परिसर निसर्गाने नटलेला आहे. त्यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाबरोबरच पर्यटनाचाही अनुभव येतो. नाशिकपासून फक्त २८ कि. मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे.
२. औंढा नागनाथ -
पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. हेमाडपंती शैलीचे हे नागनाथाचे मंदिर असून याचा विस्तार ६०,००० चौ. फूट एवढा प्रचंड आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही, तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या आवारात १२ ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे असून, १०८ महादेवाची मंदिरे आणि आणखी ६८ महादेवाच्या पिंडी आहेत. याशिवाय वेदव्यासलिंग, भंडारेश्वर, नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रय, मुरलीमनोहर, दशावतार यांचीदेखील मंदिरे आहेत.

मंदिरावर शिल्पकलेचे उत्कृष्ट काम केलेले आहे. परिसरात मोठे मैदान असून आठ खांबांचे मोठे दालन आहे. संत विठोबा खेचर हे इथलेच. संत नामदेव हे जवळच असलेल्या नरसीचे होते. असे समजले जाते, की, संत नामदेव जेव्हा कीर्तन करीत होते, त्या वेळी नागनाथ मंदिराने आपले तोंड त्या दिशेला फिरवले होते.

औंढा नागनाथच्या शेजारील राजापूर गावातील उत्खननात प्राचीन काळच्या सुंदर व रेखीव अशा मूर्ती सापडल्या आहेत. सिद्धेश्र्वर व येलदरी ही प्रसिद्ध धरणे व पर्यटनाची ठिकाणे येथून जवळच आहेत. औंढा-नागनाथला जाण्यासाठी परभणीहून ४०-४५ मिनिटे लागतात. नांदेड या शहरापासून ६४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात, औंढा नागनाथ तालुक्यात हे स्थान आहे.
३. घृष्णेश्वर -
बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्र्वराचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. शिवशंकराच्या उपासकांसाठी पवित्रस्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात शिवभक्तांची खूप मोठी गर्दी होत असते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी इ.स. १७६५ ते १७९५ दरम्यान घृष्णेश्र्वराचे संपुर्ण मंदिर बांधून त्यावर नक्षीकाम करून घेतले.

घृष्णेश्र्वराचे मंदिर औरंगाबाद जिल्ह्यात असून वेरूळपासून अगदी जवळ आहे. भाविक लोक दर्शनासाठी आल्यानंतर जगप्रसिद्ध असणार्‍या वेरूळच्या लेणी पाहिल्याशिवाय परत जात नाहीत.

या मंदिरापासून जवळच श्रीगणेशाचे २१ आद्यपीठापैकी एक लक्षविनायक मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्या घराचे अवशेषदेखील (जुना वाडा) मंदिराजवळ आहेत. औरंगाबादपासून ३० कि. मी. अंतरावर हे मंदिर आहे.
४. भीमाशंकर -
भीमानदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आहे. मंदिराबाबत असे म्हणतात की, १८ व्या शतकात नाना फडणीसानी हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर हेमाडपंती आहे. मंदिरावर उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने पाहवयास मिळतात. `भीमा' नदीचा उगम आणि श्री महादेवाचे - शंकराचे स्थान, म्हणून याला `भीमा-शंकर' असे म्हणतात.

भीमाशंकर हे एक थंड हवेचे ठिकाण असून मंदिराच्या आजुबाजुचा परिसर - डोंगरदर्‍यांनी युक्त, दाट जंगलांचा असा - निसर्गरम्य आहे.

हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. जवळच कोकणकडा व नागफणी हे दोन महत्त्वाचे कडे आहेत. या कड्यावरून कोकणाचे निसर्गसौंदर्य पाहावयास मिळते.

राजगुरूनगरपासून भीमाशंकर अवघ्या ९५ कि. मी. अंतरावर आहे. तर पुण्यापासून मंचर मार्गे १२८ कि.मी. अंतरावर आहे. भीमाशंकर हे आंबेगांव आणि राजगुरूनगर तालुक्यात विभागले गेले आहे. भीमा नदीचा उगम हा राजगुरूनगर  तालुक्यात झालेला आहे. तर मंदिराच्या पायर्‍यांवरील गावाचा भाग हा आंबेगाव तालुक्यात आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी जास्त संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
५. परळी वैजनाथ -
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

मंदिरापासून जवळच तीन कि. मी. अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. जवळच अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ ५५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६१ कि. मी. अंतरावर हे ठकाण आहे. या ठिकाणापासून वाहनाची सतत सोय आहे. परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात असून येथून जवळच औष्णिक विद्युत केंद्र आहे.
तीर्थक्षेत्रे :
 
अष्टविनायक :
श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक! अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.

श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर नक्षीकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -
१. मोरगांव -
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

जवळच कर्‍हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.
२. थेऊर -
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला सोंड आहे.

पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते.  थेऊरचा विस्तार हा माधवराव  पेशवे यांनी केला.  माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले.  यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)

३. सिद्धटेक -
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.
४. रांजणगाव -
अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.

हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.
५. ओझर-
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.
६. लेण्याद्री -
अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
७. महड -
महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.
८. पाली -
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणार्‍या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.

या अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत ती पुढीलप्रमाणे -
( येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते.)
१. नागपूर - जि. नागपूर

२ अदासा - जि. नागपूर

३. रामटेक - जि. नागपूर

४. मेंढा - जि. नागपूर

५. पौनी - जि. नागपूर

६. केळझर - जि. वर्धा

७. कळंब - जि. यवतमाळ

८. चंद्रपूर - जि. चंद्रपूर.
आधुनिक महाराष्ट्र :
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. १मे, १९६० ते १९ नोव्हेंबर, १९६२ अशी त्यांची कारकीर्द होती. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. मोफत शिक्षणाची सोय, उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ स्थापना, सैनिकी शाळा, आदिवासी विकास, सहकारी चळवळी अंतर्गत १८ साखर कारखाने सुरू करणे, कसेल त्याची जमीन कायदा, पाटबंधारे व उद्योग, कोयना वीज प्रकल्प, पंचायत राज्य, साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना, विश्वकोश मंडळ ही त्यांच्या कारकीर्दीची जमेची बाजू होय. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केल्यामुळे त्यांना दिल्लीला संरक्षणमंत्री म्हणून जावे लागले.

यशवंतरावांनंतर मारोतराव कन्नमवार २० नोव्हेंबर, १९६२ ते २४ नोव्हेंबर,१९६३ या कालावधीसाठी मुख्यमंत्री झाले. राष्ट्रीय संरक्षण निधी उभारणे, कापूस एकाधिकार योजना ही त्यांची जमेची बाजू. मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांचे निधन झाल्याने पी. के. सावंत २५ नोव्हेंबर, १९६३ ते ४ डिसेंबर,१९६३ या कालावधीसाठी हंगामी मुख्यमंत्री झाले.

त्यांच्यानंतर वसंतराव नाईक ५ डिसेंबर, १९६३ ते २० फेब्रुवारी, १९७५ या कालावधीत मुख्यमंत्री झाले. त्यांनी कापूस, ज्वारी, भात या पिकांची शासकीय खरेदी सुरू केली. शेतकर्‍यांना गाय विकत घेण्यासाठी कर्जे, ग्रामीण रोजगार हमी व गरिबी हटाव योजना, कृषी विद्यापीठ निर्मिती, खुले कारागृह स्थापना, शासकीय लॉटरी, मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा करणे - ही त्यांच्या कारकीर्दीची ठळक वैशिष्ट्ये होत. पुढे शंकरराव चव्हाण २१ फेब्रुवारी, १९७५ ते १६ एप्रिल, १९७७ या कालावधीसाठी मुख्यमंत्री झाले. जायकवाडी प्रकल्प, अन्य पाटबंधारे प्रकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, कुटुंबनियोजन, महामंडळांबाबतचे धोरण, मराठवाडा ग्रामीण बँकेची स्थापना, रेल्वे रुंदीकरण, आमदार प्रशिक्षण, जवाहर रोजगार योजना हे  त्यांच्या कारकीर्दीतील ठळक मुद्दे होत. ते १९८६ ते १९८८ या काळातही मुख्यमंत्री होते.

पुढील काळात मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील ४ वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९७७-७८, ८३-८५ या काळात ते मुख्यमंत्री होते. सहकाराच्या क्षेत्राचा विकास, साखर कारखाने, विना अनुदान शिक्षण पद्धती या क्षेत्रांत त्यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्यानंतर शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते देखील ४ वेळा (७८-८०, ८८-९०, ९०-९१, ९३-९५) मुख्यमंत्री झाले. कापूस एकाधिकार योजनेत दुरुस्ती, फळबागा लागवड, आधुनिक कृषी पद्धती, कृषी निर्यात, औद्योगिक विकास, महिलांना राजकारणात राखीव जागा, भूकंपानंतरचे पुनर्वसन या क्षेत्रांत त्यांनी अजोड कामगिरी केली. १७ फेब‘ुवारी, १९८० ते ८ जून, १९८० या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होती.

बॅ. ए. आर. अंतुले ९ जून, १९८० ते जानेवारी, १९८२ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शेतकर्‍यांची कर्जमाफी, धडाडीचे निर्णय, पेन्शनमध्ये वाढ, नव्या जिल्ह्यांची निर्मिती, सार्वजनिक बांधकाम या क्षेत्रात त्यांनी वेगवान निर्णय घेतले. नंतर बॅ. बाबासाहेब भोसले २१/१/८२ ते १/२/८३ या कालावधीत मुख्यमंत्री झाले. श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना, मच्छिमारांना विमा, मंत्र्यांचे पगार कमी करणे, स्वातंत्र्यैनिक निवृत्ती वेतनात वाढ, अमरावती विद्यापीठ स्थापना, मराठी चित्रसृष्टी उभारण्याचा निर्णय, औरंगाबादच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची सुरुवात या त्यांच्या कारकीर्दीतील जमेच्या गोष्टी होत.  पुढे शिवाजीराव निलंगेकर ३/६/८५ ते १३/३/८६ या कालावधीसाठी मुख्यमंत्री झाले. त्यांनी मराठवाडा, विदर्भ, कोकण विकासासाठी कार्यक्रम, पीकविमा योजना, विद्युतीकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तालुका पातळीवर नेणे, दूरदर्शन संच पुरवठा, लोकन्यायालये, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान, मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षण, स्वतंत्र पर्यावरण विभाग स्थापणे असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

त्यानंतर पुन्हा शंकरराव चव्हाण, शरद पवार व पुढे सुधाकरराव नाईक (२५/६/९१ ते ५/३/९३) मुख्यमंत्री झाले.  ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ सूत्राचा प्रसार, जिल्हा परिषद निवडणुका, स्वतंत्र महिला व बालकल्याण विभाग, म. गांधी यांची आत्मकथा शासकीय पातळीवर छापून ती घरोघरी नेणे हे या कालावधीतील महत्त्वाचे निर्णय होत.

भारतीय जनता पार्टी- शिवसेना युतीचे मनोहर जोशी १४ मार्च, १९९५ ते ३१ मार्च १९९९ या कालावधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात प्रथमच बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आले. त्याचे श्रेय शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे व भाजपच नेते प्रमोद महाजन यांना जाते. मुंबईतील उड्डाणपूल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, कृष्णा खोरे विकास महामंडळ, झोपडपट्टीयांसाठी मोफत घरे, एक रुपयात झुणका भाकर, टँकरमुक्त महाराष्ट्र, क्रिडा प्रबोधिनी, ज्येष्ठ नागरिकांस मोफत प्रवास, मातोश्री वृद्धाश्रम योजना या युती शासनाच्या जमेच्या बाजू होत. मनोहर जोशी यांच्यानंतर नारायण राणे (१ फेब्रुवारी १९९९ ते १७ आक्टोबर, १९९९) हे मुख्यमंत्री झाले. निवृत्तीवय, जिजामाता महिला आधार विमा योजना, बळीराजा संरक्षण विमा योजना, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा उभारणे, जकात कर रद्द करणे, नव्या तालुक्यांची निर्मिती, सर्व जिल्हे इंटरनेटद्वारे जोडणे या त्यांच्या कारकीर्दीच्या जमेच्या बाजू होत.

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची सत्ता प्रस्थापित होऊन विलासराव देशमुख १८ ऑक्टोबर, १९९९ ते १७ जानेवारी, २००३ या कालावधीसाठी मुख्यमंत्री झाले. अनावश्यक नोकरभरती बंद करणे, शेतकर्‍यांसाठी १ हजार कोटींची योजना आखणे, खर्चावर नियंत्रण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण स्वच्छता अभियान व संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता अभियान, पहिलीपासून इंग्रजी, शिक्षण सेवक नियुक्ती, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम, मौलाना अब्दुल कलाम आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ स्थापना,  सार्वजनिक वितरण यंत्रणा सुधारणे, वस्ती शाळा या त्यांच्या कारकीर्दीतील विधायक गोष्टी होत. त्यांच्यानंतर सुशीलकुमार शिंदे १८ जानेवारी, २००३ ते ३१ ऑक्टोबर, २००४ या कालावधीसाठी मुख्यमंत्री झाले. टँकरमुक्तीसाठी प्रयत्न, मोफत पुस्तके वाटप, वीज प्रश्र्न, मागासवर्गीयांचा अनुशेष भरणे, अनुसूचीत जाती जमाती आयोग महाराष्ट्रात नेमणे, मागासवर्गीय महामंडळाची पुनर्रचना, बालहक्क आयोग स्थापना हे त्यांचे उल्लेखनीय निर्णय होत. १ नोव्हेंबर, २००४ पासून विलासराव देशमुख पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. २६ नोव्हेंबर,२००८ रोजी मुंबईवर दुर्दैवी दहशतवादी हल्ला झाला. या पार्श्वभूमीवर केंद्रीत व राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी घडल्या, आणि अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.


संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांची सूची :
महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना विनम्र अभिवादन!

सीताराम बनाजी पवार गोविंद बाबूराव जोगल
जोसेफ डेव्हिड पेजारकर पांडुरंग धोंडू धाडवे
चिमणराव डी. शेठ गोपाळ चिमाजी कोरडे
भास्कर नारायण कामतेकर पांडुरंग बाबाजी जाधव
रामचंद्र सेवाराम बाबू हरी दाते
शंकर खोटे अनुप महावीर
धर्माजी गंगाराम नागवेकर विनायक पांचाळ
रामचंद्र लक्ष्मण जाधव सीताराम गणपत म्हादे
के. जे. झेवियर सुभाष भिवा बोरकर
पी. एस्. जॉन गणपत रामा नानाकर
शरद जी. वाणी सीताराम गयादीन
बेदीसिंग गोरखनाद रावजी जगताप
रामचंद्र भाटिया महमंद अली
गंगाराम गुणाजी तुळशीराम पुंजाजी बेलसरे
गजानन ऊर्फ बंडू गोखले देवाजी सखाराम पाटील
निवृत्ती विठोबा मोरे शामलाल जेठानंद
आत्माराम पुरूषोत्तम पानवलकर सदाशिव महादेव भोसले
बालण्णा मुतण्णा कामाठी भिकाजी पांडुरंग रंगाटे
धोंडू लक्ष्मण पारडुले वासुदेव सूर्याजी मांजरेकर
भाऊ सखाराम कदम भिकाजी बाबू बावस्कर
यशवंत बाबाजी भगत सखाराम श्रीपत ढमाले
नरेंद्र नारायण प्रधान रत्नू गोदीवरे
शंकर गोपाळ कुष्टे सय्यद कासम
दत्ताराम कृष्णा सावंत भिकाजी दाजी
बबन बापू भरगुडे अनंत गोलतकर
विष्णु सखाराम बने किसन विरकर
सीताराम धोंडू राड्ये सुखलाल रामलाल वंसकर
तुकाराम धोंडू शिंदे पांडुरंग विष्णू वाळके
विठ्ठल गंगाराम मोरे फुलवी मगरू
रामा लखन विंदा गुलाब कृष्णा खवळे
एडवीन आमब्रोझ साळवी बाबूराव देवदास पाटील
बाबू महादू सावंत लक्ष्मण नरहरी थोरात
वसंत द्वारकानाथ कन्याळकर ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
विठ्ठल दौलत साळुंखे गणपत रामा भूते
रामनाथ पांडुरंग अमृते मुन्शी वझीर अली
परशुराम अंबाजी देसाई दौलतराम मथुरादास
घनश्याम बाबू कोलार विठ्ठल नारायण चव्हाण
धोंडू रामकृष्ण सुतार देवजी शिवन राठोड
मुनीमजी बलदेव पांडे रावजीभाई डोसाभाई पटेल
मारूती विठोबा म्हस्के होरमसजी करसेटजी
भाऊ कोंडिबा भास्कर गिरधर हेमचंद्र लोहार
धोंडो राघो पुजारी सत्तू खंडू वाईकर
व्हदयसिंग दारजेसिंग गणपत श्रीधर जोशी (नाशिक)
शंकर विठोबा राणे माधव राजाराम तुरे (नाशिक)
पांडू महादू अवरीकर मारूती बेन्नाळकर (बेळगाव)
विजयकुमार सदाशिव भडेकर मधुकर बापू बांदेकर (बेळगाव)
कृष्णाजी गणू शिंदे लक्ष्मण गोविंद गावडे(बेळगाव)
रामचंद्र विठ्ठल चौगुले महादेव बारीगडी (बेळगाव)
धोंडू भागू जाधव कमलाबाई मोहिते (निपाणी)
रघुनाथ सखाराम बिनगुडे सीताराम दुलाजी घाडीगावकर (मुंबई)
काशिनाथ गोविंद बिंदुरकर करपय्या किरमल देवेंद्र
चुलाराम मंबराज बालमोहन
अनंता गंगाराम विष्णू गुरव
संयुक्त महाराष्ट्र चळवळ :
दिनांक १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. भाषावार प्रांतरचनेच्या चौकटीत महाराष्ट्र निर्माण झाला. परंतु त्यासाठी १०६ हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले. संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याअगोदर द्वैभाषिक राज्य अस्तित्वात आले. परंतु मराठी माणसांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आणि एक स्वप्न खंडित स्वरूपात (कारवार, बेळगाव वगळून पण मुंबईसह) साकार केले.
पार्श्र्वभूमी :
संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपणास १९२० पर्यंत मागे नेता येतो. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य यांची सांधेजोड करून राष्ट्रीय शिक्षण मातृभाषेतून देण्याची गरज प्रतिपादन केली. याच काळातील लोकशाही स्वराज्य पक्षाच्या (काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टी) उद्देशपत्रिकेत व पक्षाच्या कार्यक्रमात भाषावार प्रांतरचनेचा आगह धरला व महाराष्ट्र हा स्वतंत्र एकभाषी प्रांत व्हावा अशी घोषणा केली. १९१७ च्या कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. पट्टभी सीतारामय्या यांनी आंध प्रांत स्वतंत्र करण्याचा ठराव मांडला. या ठरावाला अॅनी बेझंट, पं. मदनमोहन मालवीय, म. गांधी यांनी विरोध केला, तर लो. टिळक यांनी पाठिंबा दिला. म. गांधी यांचे मतपरिवर्तन झाल्यावर १९२१ च्या नागपूर अधिवेशनात म. गांधी यांनीच ‘भाषावार प्रांतरचनेचा’ ठराव मांडला. कॉंग्रेसची फेर उभारणी भाषा तत्त्वावर केली यामुळे कॉंग्रेस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला मदत झाली. १९२८ मध्ये कामकरी शेतकरी पक्षाने पं. मोतीलाल नेहरू कमिटीसमोर भाषावार राज्याची मागणी करून महाराष्ट्राची मागणी पुढे केली. नेहरू कमिशननेसुद्धा भाषावार प्रांतरचनेची मागणी मान्य केली.

१५ ऑक्टोबर, १९३८ रोजी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ‘वर्‍हाडसह महाराष्ट्राचा एकभाषी प्रांत’ असा शब्द मुद्दाम वापरण्यात आला. कारण ‘सी. पी. अँड बेरार’ प्रांतातून वर्‍हाड वगळून त्याचा स्वतंत्र विदर्भ प्रांत करण्यात यावा अशी शिफारस मुख्यमंत्री रवीशंकर शुक्ल यांनी केली होती. १९३९ च्या नगरच्या साहित्य संमेलनात ‘मराठी भाषा’ प्रदेशांचा मिळून जो प्रांत बनेल, त्याला ‘संयुक्त महाराष्ट्र’ असे नाव द्यावे असा ठराव झाला. ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा शब्दप्रयोग येथपासून वापरात आला. ‘सी.पी.अँड बेरार’ प्रांताच्या विधीमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी ‘वर्‍हाड’ च्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबईत ‘संयुक्त महाराष्ट्र सभा’ स्थापली. १९४१ मध्ये पुण्यात डॉ. केदार यांच्या नेतृत्वाखाली  ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ स्थापण्यात आली.
बेळगांव साहित्य संमेलन -
दिनांक १३ मे, १९४६ रोजी बेळगांव येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या ललित विभागाचे अध्यक्ष माडखोलकर यांनी भाषणात ‘संयुक्त महाराष्ट्राच्या’ मागणीचे सूतोवाच केले. संयुक्त महाराष्ट्रात मुंबई, मध्यप्रांत, वर्‍हाड, मराठवाडा, गोमंतक यांचा त्यांनी समावेश केला होता. या ठरावाच्या पाठपुराव्यासाठी २८ जुलै, १९४६ रोजी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरविण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या जळगाव परिषदेने मुंबईसह महाराष्ट्राचा नारा दिला. भारताचे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येऊ लागल्यावर डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भाषावार प्रांतरचना कितपत उपयुक्त आहे हे बघण्यासाठी न्यायमूर्ती एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. आयोगाचे कामकाज चालू असतानाच ३० ऑगस्ट, १९४७ रोजी म. गांधी यांनी ‘हरिजन’ मध्ये भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात लेख लिहिला. ‘भाषावार प्रांतरचनेला धरून मुंबईने योग्य ती सर्वमान्य योजना तयार करावी’, असे गांधीजींनी सुचविले. दार कमिशनसमोर १७ प्रमुख नेत्यांनी स्वाक्षरी करून ‘अकोला करार’ केला. १९४८ मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे मुंबईत अधिवेशन भरले. तेथे अण्णा भाऊ साठे यांनी ‘मुंबई कुणाची’ हा कार्यक‘म सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दार कमिशनला जे निवेदन दिले त्यात त्यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ यावर भर दिला. दिनांक १० डिसेंबर, १९४८ ला दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला. दार यांनी मुंबईवर महाराष्ट्राचा हक्क नसल्याचे सांगितले. दार कमिशनच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताच जयपूर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टभी सीतारामय्या यांची ‘जेव्हीपी’ समिती निर्माण केली गेली. या समितीनेसुद्धा पुढे मुंबईसह महाराष्ट्राला विरोध केला. या समितीचा अहवाल येताच रामराव देशमुख यांनी स्वतंत्र वर्‍हाडचा आग्रह सोडून मध्यप्रांत - वर्‍हाडप्रांत मुंबई राज्यात समाविष्ट करण्याची मागणी केली. सरदार पटेल व नेहरूंना महाराष्ट्रात कोण विरोध करणार? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राण फुंकण्यासाठी सेनापती बापट पुढे झाले. २८ नोव्हेंबर, १९४९ रोजी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये आचार्य अत्रे व आर. डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव मांडला.

महाराष्ट्रात अशी गडबड चालू असतानाच स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलु यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला. यानंतर भाषावार प्रांतरचनेचा निर्णय करण्यासाठी पं. नेहरू यांनी फाजलअली आयोग नेमला. आयोगापुढे संयुक्त महाराष्ट्र परिषदेने आपले निवेदन ठेवले. आयोगाने  द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. आयोगाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य व संपूर्ण गुजराथी प्रदेशासह मराठवाडा धरून मुंबईच्या द्वैभाषिक राज्याची शिफारस केली. मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी, ‘पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला देणार नाही’, अशी वल्गना केली. विधानसभेत ‘त्रिराज्य’ स्थापनेचे बील (विधेयक) चर्चेला येणार होते. महाराष्ट्रातील जनतेने याच्या विरोधात मोर्चा काढला. सरकारने विधानसभेकडे जाणारे रस्ते अडवले. जमाव हाताळता न आल्याने पोलिसांनी गोळीबार केला यात १५ जण मरण पावले. सेनापती बापट यांना अटक करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विविध वेळी झालेल्या आंदोलनांत एकूण जे १०६ हुतात्मे झाले त्यातील हे पहिले पंधरा होत. त्रिराज्य ठरावाच्या विरोधात ‘लोकमान्य’ पत्राचे संपादक पां. वा. गाडगीळ यांनी विधानपरिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकमताच्या दडपणामुळे त्रिराज्य ठराव बारगळला.
दिनांक १६ जानेवारी, १९५६ रोजी पं. नेहरू यांनी मुंबई शहर केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली राहील अशी घोषणा केली व त्रिराज्याऐवजी ‘द्वैभाषिकाची’ घोषणा केली. ‘विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छसह गुजराथ’, अशी घोषणा केली. जनतेच्या प्रतिकि‘या या निर्णयाच्या विरोधात जाताहेत हे पाहून पोलिसांनी गोळीबार केला. १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत एकूण ६७ लोक हुतात्मा झाले. याच वेळेला जयप्रकाश नारायण यांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला देण्याची मागणी केली. हैदराबाद विधानसभा कॉंग्रेस पक्षानेसुद्धा याच मागणीची ‘री’ ओढली. संसदेत फिरोज गांधी यांनी मुंबई महाराष्ट्राला द्यावी असे सांगितले. विख्यात अर्थतज्ज्ञ व मंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मुंबईच्या प्रश्र्नावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनाम दिला. जून, १९५६ मध्ये इंग्लंडची राजधानी लंडन येथे ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ ची स्थापना झाली.

ऑगस्ट, १९५६ मध्ये लोकसभेत ‘महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गुजराथ, सौराष्ट, कच्छ, मुंबई यांचे मिळून एक संमिश्र राज्य करावे अशी सूचना आली. सरकारने ती तात्काळ स्वीकारली. ऑक्टोबर, १९५६ मध्ये मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याने यशवंतराव चव्हाण मु‘यमंत्री झाले. या नव्या राज्याची मुंबई राजधानी झाली. कॉंग्रेसला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र विधानसभा पक्ष अस्तित्वात आला. मुंबई महापालिकेत या पक्षाला बहुमत मिळाले व आचार्य दोंदे महापौर झाले. १९५९ मध्ये इंदिरा गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, द्वैभाषिक राज्य ही न टिकणारी गोष्ट आहे. त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी ९ सदस्यीय समिती नेमली. या समितीने द्वैभाषिक राज्य संपुष्टात आणून गुजरात या स्वतंत्र राज्याची शिफारस केली. इंदिरा गांधी यांनी मुंबईसह महाराष्ट्र ही भूमिका मान्य केली. संसदेने दिनांक १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आणण्याची घोषणा केली. २६ जिल्हे, २२९ तालुके समाविष्ट असणारे राज्य अस्तित्वात आले.
स्वातंत्र्यचळवळ :

ईस्ट इंडिया कंपनी -
दिनांक ३१ डिसेंबर, १६०० रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतात ‘तराजू-तलवार-तख्त असा प्रवास केला. भारतात पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थायिक झाली, तर कंपनीने मुघल साम्राज्यातील प्रदेशात स्वत:चे बस्तान बसविले. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगालची राजकन्या कॅथेरिन ब्रॅगांझा हिच्याशी झाले, तेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई बंदर  इंग्रजांना हुंडा म्हणून दिले. हा सारा प्रकार म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र होते. मुंबई बंदराचा फायदा घेऊन १८१८ ते १८५७ या कालखंडात कंपनीने आपली सत्ता झपाट्याने महाराष्ट्रात पसरविली. सातारच्या प्रतापसिंह महाराजांना फसवून त्यांच्या अंमलाखाली असणारी संस्थाने कंपनीने ताब्यात घेतली. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर धोरण राबवून संस्थाने ताब्यात घेतली. एलफिन्स्टनने अत्यंत कुशलतेने मुंबई इलाखा जिंकला. ‘कारकून ते जिल्हाधिकारी’ अशा प्रकारची प्रशासन व्यवस्था एलफिन्स्टनने तयार केली.

१८५० मध्ये लोकांचा कारभारात समावेश असावा म्हणून नगरपालिका निर्माण करण्यात आल्या. कंपनीने १८६१ पासून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पोलीस अधिकारी नेमून महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था स्वत:च्या सोयीसाठी निर्माण केली. १८९४ मध्ये तुरुंग कायदे येथे आले. ‘कायद्यासमोर सारे भारतीय समान’ अशी इंग्रजांची भूमिका होती. १८३३ मध्ये कायदा आयोग आला व १८३७ मध्ये येथे ‘पीनल कोड’ (दंडसंहिता) लागू करण्यात आला. यातून उतरंड असणारी खर्चिक न्यायालय व्यवस्था उदयाला आली. दिनांक १४ ऑगस्ट, १८६२ रोजी मुंबई हायकोर्टाची स्थापना करण्यात आली. भारतीय लोकांना शस्त्रास्त्रे बाळगण्यावर बंदी घालण्यात आल्याने महाराष्ट्रातील सरदारांच्या तलवारींच्या विळ्या झाल्या. १८५७ च्या अगोदरच येथे पोस्ट व तारयंत्र सुरू झाले. १८६५ पासून गॅझेटियर तयार करण्याचे कार्य आणि १८७१ पासून जनगणना करण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्रात रयतवारी, कायमधारा व अन्य महसूलपद्धती इंग्रजांनी आणल्या. इनाम कमिशन नेमून महाराष्ट्रातील ३२ हजार इनामांची चौकशी करून २१ हजार वतने पुरावा नसल्याने जप्त केली, तर काही वतनांची कागदपत्रे जाळून टाकली. या सगळ्या पार्श्र्वभूमीवर ब्रिटिशांना महाराष्ट्रात पुढील असंतोषास तोंड द्यावे लागले.

१८१८ मध्ये खानदेशातील भिल्लानी गोदाजी डेंगळे आणि महिपा डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. बीडच्या धर्माजी प्रतापरावांचे बंड (१८१८), नांदेडमधील हंसाजी नाईक हटकर यांचा उठाव (१८१९-२०), चितूरसिंग, सत्तू नाईक, उमाजी नाईक यांचा सशस्त्र लढा (१८२६-३१), सावंतवाडीकरांचा लढा (१८२८-३८), कोल्हापूरच्या गडकर्‍यांचा उठाव (१८४४) - महाराष्ट्रात असे अनेक उठाव झाले. परंतु इंग्रजांनी हे उठाव मोडून काढले. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात कोल्हापूर, सातारा, मुंबई, खानदेश, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, मुधोळ येथील लोकांनी सक्रिय सहभाग घेतला. परंतु नानासाहेब उर्फ धोंडोपंत पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे यांस अपयश आले आणि १८५७ चा लढा अयशस्वी ठरला.

१८७४-७८ या कालखंडात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अन्याय करणार्‍या सावकारांविरुद्ध स्थानिक जनतेने जी बंडे केली ती दख्खन दंगे म्हणून प्रसिद्ध आहेत. ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आणण्याच्या विचाराने प्रवृत्त झालेल्या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (१८४५-१८८३) यांना इंग्रज सरकारने एडनच्या तुरुंगात मृत्यूपर्यंत ठेवले. या सगळ्यातून महाराष्ट्रातील लोकांच्या लक्षात आले की आपण ब्रिटिशांविरुद्ध प्रदीर्घ काळ केवळ संघर्ष करू शकत नाही. यातून राजकीय संस्थांचा उदय झाला. ‘हिंदी राजकारणाचा पाया घालण्याचे काम’ करणारी बॉम्बे असोसिएशन दिनांक २६ ऑगस्ट, १८५२ रोजी मुंबईत जन्माला आली. जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई नौरोजी हे संस्थापक. या संस्थेचा प्रमुख उद्देश म्हणजे भारतीयांच्या अडचणी राज्यकर्त्यांच्या कानी घालणे व त्यांचे निराकरण करणे हा होय. याचा पुढचा मैलाचा दगड म्हणजे सार्वजनिक सभा होय. गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या सभेने मिठाच्या जाचक प्रश्नावर आंदोलन केले. तसेच मॉरिशसमधील भारतीयांस मदत, दक्षिणेतील शेतकर्‍यांचा कायदा करणे, दुष्काळ समिती, मुद्रणस्वातंत्र्य, स्वदेशी, फेमिन कोडचे भाषांतर या क्षेत्रांत प्रभावी कार्य केले. यामुळेच अखिल भारतीय काँग्रेस संघटनेच्या स्थापनेची पार्श्र्वभूमी तयार झाली. काँग्रेस या शब्दाचा अर्थच मुळी एकत्र येणे! २८ डिसेंबर, १८८५ रोजी काँग्रेसचे १ले अधिवेशन मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात भरले. यास उपस्थित असणार्‍या ७२ प्रतिनिधींपैकी मुंबई इलाख्यातील ३८ जण हाते. काँग्रेसच्या कार्यात सुरुवातीला महाराष्ट्रातील दादाभाई नौरोजी, न्या. म. गो. रानडे, फिरोजशहा मेहता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा समावेश होता.
टिळकयुग :
पुढे लोकमान्य टिळक यांनी त्याग व तुरुंगवास आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांच्या द्वारे अखिल भारतीय नेतृत्व प्राप्त केले. केसरीतील लेखन, शिवजयंती, गणेशोत्सव, दुष्काळातील कार्य, गीतारहस्याचे लेखन, डोंगरी-मंडाले येथील तुरुंगवास यांमुळे टिळकांना लोकमान्यत्व आणि अखिल भारतीय नेतृत्व प्राप्त झाले. त्यांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार यांचा पुरस्कार केला. होमरुल लीगला पाठिंबा दिला. टिळकांच्या काळात चाफेकर बंधूंनी पुण्याचा ‘प्लेग कमिशनर’ रँड याची हत्या केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०४ मध्ये अभिनव भारत या क्रांतिकारी संस्थेची पारतंत्र्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी स्थापना केली. सावरकरांच्या प्रेरणेने इंग्लंडमध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झन वायलीवर गोळ्या झाडल्या. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनवर क्रांतिकारक अनंत कान्हेरेंनी गोळ्या झाडल्या. सेनापती पांडुरंग महादेव बापट बॉम्बचे प्रशिक्षण घेण्यास विलायतेला गेले. सावरकरांवर खटला भरून सरकारने त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्यावर पाठवले. विष्णू गणेश पिंगळे, हुतात्मा शिवराम हरि राजगुरु, बाबू गेनू, हुतात्मा शिरीषकुमार यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले आणि टिळक युगाचा अंत झाला. लोकमान्य टिळक यांच्या काळात ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष आणि राष्ट्रवाद यांचा संपूर्ण भारतात प्रसार झाला.
महात्मा गांधी युग :
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर ३१ ऑक्टोबर, १९२० रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियनचे (आयटक) पहिले अधिवेशन मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरले. १९२० च्या काँग्रेच्या नागपूर अधिवेशनात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाला मान्यता मिळाली. याच ठिकाणी महात्मा गांधींनी ‘एक वर्षात स्वराज्य’ अशी घोषणा केली. १९२१ मध्ये महाराष्ट्रातील विविध संस्थानांमधील प्रजेच्या हितासाठी ‘दक्षिणी संस्थान हितवर्धक सभा स्थापण्यात आली. याच वेळी इंग्लंडचे युवराज मुंबईला येणार असल्याचे वृत्त येताच त्या विरोधात वातावरण तयार झाले. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी प्रतियोगी सहकारिता पक्ष स्थापून आपले कार्य पुढे चालू ठेवले. मुंबईत श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली सायमन कमिशनला मराठी हिसका दाखविण्यात आला. महात्मा गांधी यांच्या मीठ सत्याग्रहाचे महाराष्ट्रात शिरोडा, कोकण, अकोला येथे पडसाद उमटले. सोलापुरात ब्रिटिश विरोधी वातावरण जबरदस्त असल्याने तेथे ४९ दिवस मार्शल लॉ लागू करण्यात आला. मलाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या चौघांना सरकारने फाशीची शिक्षा ठोठावली. महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंग चळवळी अंतर्गत विदर्भात जंगल सत्याग्रह, सातारा जिल्ह्यातील बिळाशी सत्याग्रह, नाशिक, रायगड येथे सत्याग्रह झाले. काँग्रेसचे खेड्यात भरविले जाणारे पहिले अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे घेण्यात आले. १९३५ च्या कायद्यानुसार भारतात प्रथमच निवडणुका झाल्या. मुंबई इलाख्याचे पंतप्रधान बाळासाहेब खेर झाले. या सरकारने जमीन महसूल सूट, खेड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रौढ शिक्षण, दारुबंदी, राजबंद्यांची सुटका या क्षेत्रांत प्रभावी कामगिरी केली. याच दरम्यान कोल्हापुरात भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रजापरिषद चळवळ वाढली. १९४० मध्ये महात्माजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले. त्याचे पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. १९४२ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन मुंबईत पं. नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरले. येथेच ‘छोडो भारत आणि चले जाव’ चा नारा प्रकटला. चंद्रपूर, रायगड, अहमदनगर, सातारा येथे जबरदस्त आंदोलने झाली. मुंबईत सरकारी यंत्रणेला समांतर असे गुप्त आकशवाणी केंद्र - आझाद रेडिओ -स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांनी चालविले. सातार्‍याच्या प्रतिसरकारने (पत्रीसरकारने) अर्थात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या काळात अतुलनीय कार्य केले. १९४६ मध्ये मुंबईत सैन्याने ब्रिटिशांविरुद्ध बंड केले.
स्वातंत्र्य :
दिनांक १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला आणि पुण्यातल्या शनिवारवाड्यावरचा युनियन जॅक कायमचा खाली आला. भारत स्वतंत्र झाला, तरी संस्थानांचा प्रश्र्न कायम होता. कोल्हापूर संस्थान महाराष्ट्रात सामील झाले. मराठवाड्याचा प्रश्न कायम होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांनी हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसच्या माध्यमातून चळवळ उभारली. सरदार पटेलांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी सैन्य हैद्राबादेत घुसवले. मराठवाडा भाग मुंबई इलाख्याला जोडला. परंतु भारत स्वतंत्र झाला तरी संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अपुरे होते.


पेशवे काळ :
धनाजी जाधव, खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ या सहकार्‍यांच्या मदतीने छत्रपती शाहू यांनी राज्यकारभारास सुरुवात केली. बाळाजी विश्वनाथांनी मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांस छत्रपती शाहूंच्या पक्षात आणले. दिनांक १६ नोव्हेंबर, १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांस छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे दिली. महाराणी ताराबाईंनी आपली सत्ता कोल्हापूरमध्ये प्रस्थापित केली. त्यामुळे मराठी राज्याचे दोन तुकडे झाले. सातारा आणि कोल्हापूर. १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ दिल्लीला गेले. त्यांनी बादशहाकडून छत्रपतींच्या नावे स्वराज्य, चौथाई, सरदेशमुखीच्या सनदा मिळविल्या. पेशव्यांनी मुघलांच्या कैदेतून छत्रपतींच्या मातोश्री येसूबाईंची सुटका केली. या सनदांमुळे दक्षिणेतील सहा मुघल सुभ्यांमध्ये चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळाला. छत्रपतींचे पूर्वार्धातील आयुष्य मुघलांच्या कैदेत गेल्यामुळे ‘त्यांनी आपणास जिवंत ठेवले व वेळ येताच सोडले’ या गोष्टीचा छत्रपतींच्या मनावर परिणाम झाला असल्यामुळे त्यांनी ‘‘दिल्लीची पातशाही रक्षून राज्यविस्तार साधावा’’ असा सल्ला पेशव्यांना दिला.

बाळाजी विश्वनाथांची आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी मराठा मंडळ अर्थात संयुक्त राज्यव्यवस्थेची निर्मिती केली. या योजनेनुसार मराठा सरदारांना त्यांच्या त्यांच्या प्रभावक्षेत्रात मर्यादित स्वायत्तता देण्यात आली व स्वराज्याचा चौफेर विस्तार करण्यास प्रवृत्त करण्यात आले. अशा या अतुल पराक्रमी सेवकाचा मृत्यू सासवडला दिनांक २ एप्रिल, १७२० रोजी झाला. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले बाजीराव हे वंशपरंपरागत पद्धतीने पेशवे झाले. ते वडिलांच्या तालमीत तयार झाले होते. हे पेशवे आयुष्यात कधीही रणांगणावर पराभूत झाले नाहीत. त्या अर्थाने ते अजेय होते व मराठी सत्तेचे विस्तारक होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी निजामाचा पराभव केला, छत्रसाल राजाची संकटातून मुक्तता केली. बंडखोर मराठे सरदारांचा बंदोबस्त केला. सिद्दी-पोर्तुगीजांचा नक्षा उतरविला. गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली भागात भीमथडीची तट्टे नेली. ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे’ अशी मराठी माणसाला अनुभूती दिली. गतिरुद्ध समाज आपसात संघर्ष करून संपतो, ही गोष्ट लक्षात घेऊन मराठी सरदारांच्या पराक्रमाला पेशव्यांनी आणि छत्रपतींनी नवे क्षितीज उपलब्ध करून दिले. या पेशव्यांच्या काळात दक्षिणाभिमुख असणारे मराठे ‘उत्तराभिमुख’ झाले. त्यामुळेच शनिवारवाड्याचे तोंड उत्तराभिमुख आहे. औरंगजेबाच्या मृत्यूने भारताच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली होती, ती मराठ्यांनी भरून काढली. अशा या पराक्रमी पेशव्याचा मृत्यू १७४० मध्ये झाला.

त्यांचे ज्येष्ठ पुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे वंशपरंपरागत पद्धतीने पेशवे झाले. दुर्दैवाने या पेशव्यांनी मराठ्यांच्या साम्राज्याचा विनाशाची अकाली बीजे पेरली. इंग्रजांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचा त्यांनी इंग्रजांच्या मदतीने पूर्ण नाश केला. माळवा, राजपुताना भागातील हिंदू राज्यकर्त्यांना अकारण दुखविले. नागपूरकर भोसल्यांशी तंटा केला. पानिपतच्या स्वारीवर स्वत: जाऊन नेतृत्व करण्याऐवजी विश्वासराव, सदाशिवराव पेशव्यांना पाठवून स्वत:चा पराभव ओढवून आणला. अहमदशाह अब्दाली याने दिल्लीवर स्वारी केली असता, ‘हिंदुस्थान आमचा आहे आणि आम्ही तो सांभाळणारच’ या एकमेव उद्देशाने भारतातील एकमेव सत्ता लढली ती म्हणजे मराठ्यांची! पानिपतावरील पराभवाचा आघात नानासाहेब सोसू शकले नाहीत, त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यांचे द्वितीय चिरंजीव थोरले माधवराव पेशवे सत्तेवर आले. १७६१ ते १७७२ इतकाच कालखंड या पेशव्याच्या वाट्याला आला. या पेशव्यांनी पानिपतच्या आघाताने मोडून पडलेली मराठी सत्ता सावरून धरली. शिंदे-होळकरांच्या कर्तृत्वास वाव दिला. काका रघुनाथराव पेशवे व जानोजी भोसले, हैदर आणि निजाम यांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी लगाम घातला. १७७२ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांना मूल नसल्याने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव गादीवर बसले. त्यांच्या निमित्ताने मराठ्यांचे सत्ताकारण ज्या गोष्टीपासून मुक्त होते त्या गोष्टी - म्हणजे खून व रक्तपात - घडण्यास सुरुवात झाली.
नारायणरावांचे काका रघुनाथराव यांनी पेशवेपदाच्या मोहाने गारद्यांच्या साहाय्याने नारायणरावांस ठार मारून पेशवेपद स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना राज्यात विरोध असल्याने नारायणरावांचे सुपुत्र सवाई माधवराव पेशवे यांस वयाच्या ४० व्या दिवशी पेशवेपदाची वस्त्रे देण्यात आली. सवाई माधवरावांच्या नावाने बारभाईंनी (नाना फडणीस, हरिपंत फडके, सखरामबापू बोकील, त्रंबकराव पेठे, मोरोबा फडणीस, बापूजी नाईक, मालोजी घोरपडे, भवानराव प्रतिनिधी, रास्ते, पटवर्धन, महादजी शिंदे, तुकोजी होळकर) कारभार पाहण्यास सुरुवात केली. नाना फडणीसांनी दक्षिण तर महादजींनी उत्तर सांभाळण्याचे ठरले परंतु १७९३ मध्ये शिंदे निधन पावले. १७९५ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांनी शनिवारवाड्यात आत्महत्या केली. त्यामुळे रघुनाथराव पेशव्यांचे पुत्र दुसरे बाजीराव पेशवे १७९६ मध्ये पेशवे झाले ते १८१८ पर्यंत. २२ वर्षे पेशवेपद त्यांच्यापूर्वी कोणालाच मिळले नव्हते. १८०० मध्ये नाना फडणीसांचा मृत्यू झाला. शिंदे व होळकर यांच्यात वर्चस्वाचा संघर्ष सुरू झाला. १८०२ मध्ये दुसरे बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांबरोबर करार करून तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली.

इंग्रज-मराठे यांच्यात ३ युद्धे झाली, परंतु मराठ्यांच्या सत्तेचा नाश इंग्रजांनी घडवून आणला. मराठे हरले कारण ते प्रगत व विकसित होत चाललेल्या भौतिक संस्कृतीच्या प्रतिनिधींबरोबर १६-१७ व्या शतकात रेंगाळणार्‍या मनोवृत्तीने लढत होते. इंग्रज तोफा, बंदुका घेऊन लढत होते, तर मराठे ढाल-तलवार, भाले घेऊन लढत होते. इंग्रजांना औद्योगिक क्रांतीचे साहाय्य झाले. ‘ज्याचे हत्यार श्रेष्ठ, त्याची संस्कृती श्रेष्ठ’ हे मराठे विसरले. देशाभिमानाचा अभाव, ना धड उत्तर ताब्यात ना दक्षिण, प्रगत दळणवळण व्यवस्थेचा अभाव, सैन्यात शिस्त नाही, दिल्लीच्या गादीवर बसण्याची कुवत असूनही न दाखविलेली धमक, कार्यक्षम हेर यंत्रणेचा अभाव, कायमस्वरूपी कर्जे अशा अनेक कारणांमुळे मराठ्यांचा पराभव झाला. लुटालुटीने फार तर वेळा भागविल्या जातात, कायमची सोय होत नाही याचा मराठ्यांना विसर पडला म्हणून मराठे हरले. मराठ्यांनी  केलेल्या चुकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना अंतिमत: पराभव स्वीकारावा लागला.
शिवोत्तर कालखंड :

छत्रपती संभाजी -
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांचा जन्म दिनांक १४ मे, १६५७ रोजी पुरंदरवर झाला. त्यांच्या मातोश्री सईबाईंचे अकाली निधन झाल्याने आजी जिजाऊसाहेबांनी त्यांस वाढविले. आग्रा प्रकरणात संभाजीराजे शिवाजी महाराजांबरोबर होते. शिवराज्याभिषेकप्रसंगी संभाजी राजांस युवराजपदाचा मान देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे छत्रपती झाले. त्यांना आयुष्यात एकाच वेळी अनेक शत्रूंचा सामना करावा लागला. मुघल सम्राट औरंगजेबाचा पुत्र अकबर मराठ्यांकडे सहकार्याच्या अपेक्षेने बंड करून आला असता महाराजांनी त्यास मदत केली. आपल्या तलवारीचे पाणी त्यांनी सिद्दी, पोर्तुगीज, आदिलशहा, मुघल यांना पाजले. मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब स्वत: दक्षिणेत उतरला. त्याने आदिलशाही-कुतुबशाही नष्ट केली. संपूर्ण भारतात त्याला आता एकच शत्रू उरला होता, तो म्हणजे मराठे! औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने दिनांक १ फेब्रुवारी, १६८९ रोजी संगमेश्र्वर मुक्कामी छत्रपती संभाजी राजांस पकडले. छत्रपती संभाजीराजे आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. आग्रा येथून सुटका करून घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबास डोईजड झाले होते. त्याप्रमाणेच,  मागील इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला नको व अन्य दोन शाहींप्रमाणेच  मराठ्यांचाही नाश करावा म्हणून औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांस ठार मारले. छत्रपती संभाजीराजांस हालहाल करून ठार मारले, ही बातमी कळताच मराठे राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले आणि त्यांनी अविरत संघर्ष सुरू केला.
छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई -
छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजारामांचा जन्म २४ फेब्रुवारी, १६७० रोजी झाला. १२ फेब्रुवारी, १६८९ रोजी ते मराठी राज्याचे छत्रपती झाले. ते रायगड किल्ल्यात मुक्कामी असताना औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने गडाला वेढा दिला. गडावर छत्रपती राजारामांव्यतिरिक्त, छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू राजे व त्यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई होत्या. त्यामुळे सगळेच सापडले, तर स्वराज्य संकटात येईल म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी स्वत:ची सुटका करवून घेऊन कर्नाटकातील जिंजीस जावे असे ठरले. त्यानुसार महाराज जिंजीला गेले तर झुल्फिकारखानाने राजघराण्यातील अन्य मंडळींना कैद करून औरंगजेबाकडे पाठवून दिले. आता महाराष्ट्र आणि जिंजी येथे एक असमान लढा सुरू झाला. औरंगजेबाचे अफाट सैन्य विरुद्ध छत्रपती राजाराम महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, प्रल्हाद निराजी प्रतिनिधी, हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य बावडेकर (हुकुमतपन्हा याचा अर्थ राज्याचा आधार) यांनी महाराष्ट्र लढत ठेवला. जिंजीच्या किल्ल्यात छत्रपती राजाराम महाराज असताना झुल्फिकारखानाने त्या किल्ल्याला वेढा दिला. पुन्हा एकदा त्या किल्ल्यातूनही स्वत:ची सुटका करून घेऊन  महाराज महाराष्ट्रात परतले. या सगळ्या कालखंडात औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता, पण युद्ध जिंकू शकत नव्हता. अशा धामधुमीच्या प्रसंगात छत्रपती राजाराम महाराजांचे दिनांक ३ मार्च, १७०० रोजी निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते.  आता मराठी राज्याची अवस्था विचित्र झाली. छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू राजे औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे सत्ता कोणी सांभाळायची असा पश्न निर्माण झाला. या वेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. औरंगजेबाच्या प्रत्येक कृतीस महाराणी ताराबाईंनी प्रतिउत्तर दिले. महाराष्ट्रात मुघलांच्या विरुद्ध एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढा सुरू केला. औरंगजेब समोरासमोरच्या लढाईत मराठ्यांचे किल्ले घेऊ शकत नव्हता म्हणून त्याने पैसे देऊन किल्ले घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ९० वर्षांचे आयुष्य जगलेला हा मुघल सम्राट अत्यंत निराश अवस्थेत दिनांक २० फेब्रुवारी, १७०७ रोजी मरण पावला. रणांगणात मृत्यू आलेला हा एकमेव मुघल सम्राट!
कवी गोविंद यांनी महाराणी ताराबाईंच्या पराक‘माचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
‘‘दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळा।।’’

सर्वसामान्यांतून उभे राहिलेले असामान्य नेतृत्व, गनिमी कावा, साधेपणा, सरंजामशाहीचे पुनरुज्जीवन यांच्या जोरावर मराठ्यांनी औरंगजेबाला पराभूत केले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठी राज्यात फूट पाडण्यासाठी औरंगजेबाचा मुलगा आज्जमशाहने मुघलांच्या कैदेतून छत्रपती शाहूंची ८ मे, १७०७ रोजी सुटका केली. शाहूराजे स्वराज्यात दाखल होताच अनेक मराठे सरदार त्यांना येऊन मिळाले. परंतु महाराणी ताराबाईंनी शाहूराजांचा सिंहासनावरील हक्क अमान्य केला. खेडच्या लढाईत महाराणी ताराबाईंचा पराभव करून शाहू राजांनी दिनांक १२ जानेवारी, १७०८ रोजी सातारा येथे स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला.
स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज :
बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले.

दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली.
प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)

आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड  बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले.
शिवाजीराजे व मुघल -
शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले.

यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला.  दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.
मध्ययुगीन महाराष्ट्र :
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाची सुरुवात आपणास रामदेवराय यादव यांच्या कालखंडापासून करावी लागते. दिल्लीचा खलजी सुलतान अलाउद्दिन खलजी याने यादवांच्या अफाट संपत्तीविषयी ऐकले होते. ही संपत्ती लुटणे, आपल्या सत्तेची दक्षिणेत ठाणी उभारणे, सत्तेचा विस्तार करणे या कारणांसाठी अलाउद्दिनने महाराष्ट्रातील यादव सत्तेच्या प्रमुख केंद्रावर म्हणजे देवगिरीवर (सध्याचे दौलताबाद) हल्ला केला. राजा रामचंद्र यादव याच्याकडून अलाउद्दिनला फारसा तिखट प्रतिकार झाला नाही. यादवांनी पुढे प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच अलाउद्दिनचा सेनापती मलिक काफूरने यादवांचा वेळोवेळी पराभव केला. रामदेवराव उर्फ राजा रामचंद्रनंतर त्यांचा मुलगा शंकरदेव व जावई हरपालदेव हे यादव सत्तेचे प्रमुख झाले परंतु या दोघांनाही महाराष्ट्राला लागलेले परकीय सत्तेचे ग्रहण संपविता आले नाही. दक्षिणेवर आक्रमण करणारा पहिला सुलतान म्हणून अलाउद्दिनचे नाव इतिहासात अजरामर झाले. संपूर्ण यादव राज्याचा नाश इ. स. १३१८ च्या सुमारास झाला. म्हणजे आजपासून (२००८ पासून) बरोबर ६९० वर्षांपूर्वी हे रामायण घडले. खलजीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने काय प्रतिक्रिया दिली याचे पुरावे इतिहासाला अज्ञात आहेत. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियांची दखल घेण्याइतपत इतिहासलेखनाचा प्रवास प्रगल्भ व्हायचा होता. त्यामुळेच या कालखंडातील इतिहासात सर्वसामान्यांचा आवाज दबला गेला आहे आणि दाबला गेला आहे.

खलजींचे दिल्लीतील राज्य संपुष्टात आल्यानंतर तुघलकांचे राज्य दिल्लीवर सुरू झाले. परंतु त्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन खलजींसारखाच होता. तुघलक घराण्यातील महंमद तुघलकाचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे. दिल्लीत राहून दक्षिण भारतावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि दिल्लीला परकीय आक्रमकांचा धोका आहे या कारणांमुळे महंमद तुघलक याने दिल्लीतून राजधानी स्थलांतरीत करण्याचा निश्चय केला. ती राजधानी दौलताबादला आणली. या प्रवासात शेकडो लोक ठार झाले. राजधानी - बदलाचा हा प्रयोग महाराष्ट्रात अभिनव होता. महंमद तुघलकाला महाराष्ट्रात- विशेषत: दौलताबादला- आल्यावर जाणवले की, जलद दळणवळणाच्या साधनांच्या अभावी दक्षिण आणि उत्तर भारतावर वर्चस्व ठेवणे अवघड आहे. याच काळात उत्तरेत बंड झाले. महंमदाच्या तख्तला हादरे बसू लागले त्यामुळे दौलताबादची औट घटकेची राजधानी परत दिल्लीला गेली. तुघलक दिल्लीच्या परतीच्या वाटेवर असतानाच दक्षिणेत बंड व्हायला सुरुवात झाली. तुघलकाने दक्षिणेतील असंतोषाचा सामना करण्यासाठी आपले काही सरदार पाठविले परंतु ते अपयशी ठरले. येथील बंडखोर मुसलमान सरदारांनी दिल्लीचा दक्षिणेचा सुभेदार निजामुद्दिन यास महाराष्ट्रात कैद केले. बंडखोर सरदारांचा नेता ‘इस्माईल मख’ याने स्वत:ला ‘नासिरुद्दीनशाह’ पदवी घेतली आणि दौलताबाद येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली. येथेच महाराष्ट्रातील स्थानिक व एतद्देशीय राज्यकर्त्यांच्या पुनरुज्जीवनाची शक्यता संपुष्टात आली. दक्षिणेतील संभाव्य धोका ओळखून तुघलक स्वत:च मोठे सैन्य घेऊन दौलताबादच्या दिशेने येऊ लागला. ही बातमी समजताच इस्माईल मख उर्फ नसिरुद्दीनशाह राज्य सोडून पळून गेला. या घडामोडी घडत असतानाच गुजरातमध्ये बंड झाले म्हणून तुघलकला तिकडे जावे लागले. त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांकडे दक्षिणेतील मोहिमेची सूत्रे दिली. परंतु ‘नासिरुद्दीनशाह’ च्या बंडखोर सैन्याने तुघलकच्या सैन्याचा पराभव केला.
त्यामुळे महाराष्ट्रात ‘नासिरुद्दीनशाह’ चा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. तो वयोवृद्ध झाल्याने त्याने आपला सहकारी ‘अलाउद्दीन हसन’ याच्या हाती सत्तेची सूत्रे दिली. ही घटना दिनांक ३ ऑगस्ट,१३४७ रोजी घडली. या अलाउद्दीन हसनचे पूर्ण नाव अलाउद्दीन हसन गंगू बहमनी होते. त्याने व त्याच्या मुलाने पाडलेल्या नाण्यांवर बहमनशाह अशी उपाधी लावून घेतली आहे. यावरून त्यांच्या घराण्याला ‘बहमनी’ नाव पडले. इ. स. १३४७ ते १५३८ अशी १९० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द या घराण्याला मिळाली. एकंदर १८ राजे या घराण्यात झाले. या १८ राजांपैकी आठ कर्तबगार निघाले, तिघांचा खून झाला, दोघांना आंधळे करण्यात आले. एक अल्पायुषी ठरला तर शेवटचे चार नामधारी राजे झाले. सोळाव्या शतकाच्या पहिल्या १-२ दशकातच बहमनी राज्याची पाच शकले झाली. यातून बीदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वर्‍हाडमध्ये एलिचपूर येथे इमादशाही, गोवळकोंडा येथे कुत्बशाही (किंवा कुतुबशाही) अशा पाच शाही निर्माण झाल्या.
अलाउद्दीन हसनचा समकालीन राजा अलीखान फारुकी याने खानदेशातील थाळनेर येथे फारुकी वंशाचे राज्य स्थापन केले. बागलाण प्रदेशात राठोडांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा रीतीने महाराष्ट्राची विभागणी या सत्तांनी आपापल्या प्रभावक्षेत्रात केली. यातील इमादशाहीचा शेवट सम्राट अकबराने २० वर्षांच्या आत घडवून आणला. अकबरानेच फारुकी सल्तनतला शेवटच्या घटका मोजायला लावल्या. पुढे बरीदशाही संपली. निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही मुघलांनी संपुष्टात आणल्या. २०० वर्षांपेक्षा जास्त एकही सत्ता टिकली नाही. या  शाहींनी स्वत:च्या सत्तेचे वर्चस्व टिकवून धरण्यासाठी महाराष्ट्रातील तत्कालीन बहुजन समाजाला हाताशी धरले. बहुविध जातींमधील लोक पुढे यायला लागले. स्वकर्तृत्वावर ते पुढे जाऊ लागले. येथील सुलतानांना याशिवाय पर्याय नव्हता. यातूनच स्वराज्याची पार्श्र्वभूमी तयार झाली. हे सगळे होत असताना राज्यकर्त्यांच्या धर्माचा प्रभाव, संस्कृतीचा प्रभाव येथील लोकजीवनावर पडला. जीवनाचे एकही क्षेत्र असे नव्हते की, जेथे राज्यकर्त्यांचा प्रभाव नव्हता. या सगळ्याला छेद देऊन ‘महाराष्ट्र धर्म’ जागविण्याचे प्रयत्न केले ते महाराष्ट्रीय संतांनी!
संतांची कामगिरी -
‘मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या  ग्रंथात न्या. महादेव गोविंद रानडे यांनी संतांच्या भूमिकेविषयी पुढील भाष्य केले आहे. ‘‘जातीजातीतील विषमता कमी करून संतांनी महाराष्ट्राची भूमी ऐक्यभावनेने नांगरून तयार केली. त्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यात स्वातंत्र्याचे बी पेरणे शक्य झाले.’’ खरं म्हणजे महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता व देशी भाषेतील विचारधन यांची निर्मिती संतांनी प्रवर्तित केलेल्या भक्तिपंथाकडूनच झाली असल्याचे दिसून येते. त्यामुळे मराठी संत हेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रमुख शिल्पकार ठरतात. धर्माचे रहस्य समजावून देऊन संतांनी उच्च व उदात्त विचार, कृती यांवर भर दिला. महाराष्ट्रात संत परंपरेचा उदय तेराव्या शतकात झाला. या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात लोकभाषांमधून भक्तिमार्गाचा प्रसार करणारे भागवतधर्मीय संत पुढे आले. परमेश्र्वरप्राप्तीसाठी उत्कट भक्तीखेरीज दुसर्‍या कशाचीच जरुरी नाही, त्यामुळे कुलजातिवर्णादी विषमतेला, स्त्री-पुरुष भेदाला किंवा विद्या, धन, प्रतिष्ठा इत्यादींमुळे प्राप्त होणार्‍या अधिकारभेदाला भागवतधर्मात बिलकुल थारा नाही, असे प्रतिपादन संतांनी केले. नाथपंथ, महानुभाव, वारकरी पंथ यांनी महाराष्ट्राला जागे केले. संत ज्ञानेश्र्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत रोहिदास व कनकदास, कान्होपात्रा, जनाबाई, चोखामेळा आदी संतांनी महाराष्ट्रात लोकजागृती केली.